वाटाण्याच्या अक्षता, विश्वासाला तडा; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
वाटाण्याच्या अक्षता, विश्वासाला तडा; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
मानवी नाते संबंधांमध्ये संवाद ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आपले विचार, भावना आणि भूमिका प्रामाणिक पणे व्यक्त करता आल्या तर नाती अधिक दृढ राहतात. पण अनेकदा लोक थेट “नाही” म्हणायला कचरतात. अशावेळी ते गोलमोल, दिशाभूल करणारी किंवा टाळाटाळ करणारी उत्तरे देतात. यालाच “वाटाण्याच्या अक्षता लावणे” म्हणतात. अक्षता शुभत्वाचे प्रतीक; परंतु वाटाण्याच्या अक्षता म्हणजे अशक्य गोष्ट. त्यामुळे वरकरणी होकारासारखा संकेत देत असला तरी प्रत्यक्षात तो ठाम नकारच असतो.
सामाजिक क्षेत्रात ही प्रवृत्ती अधिक दिसून येते. एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकार ताना “पाहूया”, “वेळ झाला तर येईन” असे उत्तर देणे हा नकारच असतो. अशा गोलमोल उत्तरांमुळे अपेक्षा निर्माण होतात, गैरसमज वाढतात. समाजातील नाते संबंधांची पारदर्शकता कमी होते. राजकारणात तर “वाटाण्याच्या अक्षता” हा प्रकार जवळजवळ सर्वव्यापी आहे. जनतेला आश्वासने देताना अनेक राजकारणी “विचाराधीन आहे”, “लवकरच निर्णय घेऊ” किंवा “समिती स्थापन केली आहे” असे विधान करतात. प्रत्यक्षात त्याचा अर्थ निर्णय टाळणे, जबाबदारी ढकलणे किंवा नकार पोचवण्याचा अप्रत्यक्ष मार्ग असतो. त्यामुळे जनतेत अविश्वास निर्माण होतो.मते मिळवण्यासाठी आश्वासने देणे आणि निवडून आले कि पाठ फिरवणे यामुळे राजकीय नेते विश्वासाला पात्र रहातात का? ही बाब विचार करण्यासारखी आहे.
मैत्रीत हा वाक्प्रचार अधिक संवेदनशील ठरतो. मित्राकडून एखादी मदत मागितल्यावर “नंतर बघू”, “आता वेळ नाही”, असे उत्तर देणे म्हणजे समोरच्याला खरे सांगणे. अशा अप्रत्यक्ष नकारांमुळे मैत्रीतील विश्वास कमी होतो, मन दुखावते. वाटाण्याच्या अक्षता लावण्याची वृत्ती सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक अशा सर्वच स्तरांवर दिसून येते. स्पष्ट, सौम्य आणि प्रामाणिक नकार देण्याची सवय जडली तर नाती अधिक निरोगी, विश्वासार्ह आणि परिपक्व होतात.नातेसंबध हे विश्वासावर टिकतात.मैत्रीत जर अशी बनवाबनवी असेल तर मने तुटायला वेळ लागत नाही. वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या वृत्तीमुळे विश्वासाला तडा जातो. ही वृत्ती बदलण्याची गरज आहे. आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘वाटाण्याच्या अक्षता’ विषय वैचारिक आहे.शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिल्या बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



