तेजाळलेलं शिखर
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर
तेजाळलेल शिखर
जो आवडतो सर्वांला तोचि आवडे देवाला…! आज राहून राहून या ओळी आठवतात. कारण, रविवार दि 25 ऑगस्ट रोजी रात्री आमचे पितृतुल्य मोठे मेहुणे विजय रामचंद्र गिरमे आम्हाला सोडून गेले.! आमचे सर्व कुटुंबीय, आप्त इष्ट नातेवाईक, सगेसोयरे यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला. माझी मोठी बहीण, दोन मुलं सुना, नातवंड असं भरलं गोकुळ त्यांच्या जाण्याने पोरकं झालं. कुटुंबियांच्या आयुष्यात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली.
खुद से ही जितने की जिद है, खुद को भी हराना है
मै भीड नही हू दूनिया की, मेरे अंदर एक जमाना है |
असंएक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असलेले आमचे दाजी म्हणजे जणू काही तेजाळलेलं शिखर…! ‘तेजाळलेलं शिखर’ या अर्थाने, की त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच त्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब, आप्त इष्ट, मित्र मंडळ या सर्वांना सलोख्याने एकत्र बांधून ठेवलं होतं. विनोदी स्वभाव आणि त्यातला स्वछंदपणा यामुळे टेन्शन, ताण तणाव यापासून ते नेहमीच अलिप्त राहिले. सुख दुःखा सोबत यशापयशाचा प्रवास करून ही आपल्या साधेपणातल्या सच्चेपणाची साथ त्यांनी कधीचं सोडली नाही. म्हणूनच, ‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची देखणी पाऊले त्यांना यशस्वी वाटचालीकडे घेऊन जात राहिली …’!
आयुष्यात अशी काही माणसं असतात त्यांच्या वागण्या बोलण्यात इतकी सकारात्मकता असते ती त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना ही सकारात्मक प्रेरणा देऊन जाते असेच आमचे दाजी. त्यांचं बोलणं जितकं स्पष्ट तितकंच परखड असायचं! परंतु त्यांच्या या वागण्या बोलण्याचा कधी ही कुणाला त्रास झालाच नाही. कारण वरून ‘श्रीफळा’सारखे सक्त असणारे आमचे दाजी तर अंतरी मात्र हळवे होते. आयुष्यात आलेल्या सुख दुःखा चा कधीही आणि कुठेही पसारा त्यांनी मांडलाच नाही. तर आलेल्या सुख दुःखाला ते सहज हसत खेळत सामोरे जात राहिले.
आपली पत्नी मुलं, सुना यांच्या वर रागावणं त्यांना कधी जमलंच नाही. कारण राग हा शब्द त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकातच नव्हता..आम्हा सर्व बहीण भावंडांना, पुतण्यांना ते कायम आधार देत असतं. वयाने मोठे असूनही नव्या पिढी बरोबर त्यांचं गणित जुळून जायचं.
दाजी तुमच्या जाण्याने तुमच्या आठवणींचे निर्माल्य जरी आमच्या सोबत राहिलं; पण त्यातला दैवी सुगंध नक्कीच दरवळत राहील. तुमच्या छायेविना सर्व काही वाटे अपूर्ण कोणत्याही धन संपत्तीने न होईल ही पोकळी परिपूर्ण.. ‘दाजी,तुम्हाला देवाचे बोलावणं आलं आणि तुम्ही अकस्मात गेलात पण तुमच्या स्मृतीचा गंध आमच्या सर्वांच्या आयुष्यात निरंतर दरवळत राहील.’
दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…
दाजी जिथे असाल तिथे आपणास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…! ‘भावपूर्ण आदरांजली”
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर



