किल्ले ‘चौल्हेर किल्ला’
स्वाती मराडे-आटोळे
किल्ले ‘चौल्हेर किल्ला’
पुण्याहून नाशिक मार्गे ९५ कि. मी. वरील सटाणा. सटाण्यावरून १५ किलोमीटर तिळवणला व तिळवणपासून २० मिनिटांवर असणाऱ्या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराची डोंगरसोंड उतरते. याच डोंगरसोंडेवरून चालत दीड तासात गडमाथा गाठता येतो. खाजगी गाडीने थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. किल्ल्याचा डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत किल्ला चढायला सुरुवात होते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण रेलिंगपाशी पोहोचतो. रेलींग संपल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.
त्या पायऱ्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो. प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाट काटकोनात वळते. काही पायऱ्या चढल्यावर दुसरा दरवाजा लागतो. पुन्हा वाट काटकोनात वळते, तेथे तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फारसा प्रकाश येत नाही. त्यामुळेच या दरवाजांचा भूयारी दरवाजे असा उल्लेख केलेला आढळतो. चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपला माचीवर प्रवेश होतो. उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण आज तो अस्तित्वात नाही.
या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मूर्ती आहे. दरवाजा समोरून गड माथ्यावर जाणारी वाट आहे. तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. हे सर्व अवशेष पाहून गडमाथ्याकडे न जाता विरुद्ध बाजूला जावे. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्याखाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरून हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो. किल्ल्याच्या माचीवरून परत फिरून प्रवेशद्वारापाशी येऊन गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फेरी मारता येते. चौरंगीनाथांचे मंदिर, हनुमानाची मूर्ती आणि इतर झिजलेल्या मूर्ती आहेत. मंदिराच्या पढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. गडमाथ्यावर काही उध्वस्त वास्तू आहेत.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
==========



