बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: श्रावण म्हटलं की सृष्टीची ऐट काय विचारता…..! संपूर्ण निसर्ग खुलून नटलेला असतो आणि यात वर्षासहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सकाळी ठीक ८.०० वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयातून मिनीडोअर मध्ये बसून मौज मजा करत, गाणी म्हणत अलिबाग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व सजलेल्या आंबेपूर या गावी पोहोचले. तेथील शिवदत्त मंदिर, उमामहेश्वर शिवमंदिर, अखंड दत्तधुनी मंदिर या अतिशय सुंदर अशा वास्तू पाहून प्रत्येकाचे मन मोहून गेले. मंदिरात जाऊन प्रत्येकाने श्री महादेवाचे व श्रीदत्तांचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली.
त्यानंतर पुन्हा मिनिडोअर मध्ये बसून सर्वजण नारळ, फोफळीच्या बागांनी नटलेल्या व सजलेल्या चौल या गावातील श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी पोहोचले. तेथील श्री रामेश्वर मंदिर, श्री बैरागी गणपती मंदिर, श्री आशापुरी माता मंदिर व श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या अतिशय सुंदर अशा पुरातन वास्तू पाहून प्रत्येकाचे मन मोहून गेले. मंदिरांमध्ये जाऊन प्रत्येकाने श्री रामेश्वराचे, श्री गणपतीचे, श्री आशापुरी मातेचे व श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली. मंदिरांसमोर असलेली अतिशय भव्य अशी पाण्याने पूर्ण भरलेली पोखरण व त्यातील पाण्यात विहार करणारे मासे हे सुंदर दृश्य पाहण्याचा सर्वांनी आनंद घेतला.
त्यानंतर मिनीडोअर मध्ये बसून सर्वजण थेरोंडा या गावी आले. तेथील अतिशय सुंदर असे सुवर्ण हनुमान मंदिर व त्या मंदिराच्या परिसरात असलेले अतिशय सुंदर असे पुतळे व प्रतिकृती पाहून प्रत्येकाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. प्रत्येकाने मंदिरात जाऊन श्री हनुमंताचे दर्शन घेतले व तेथील परीसरात असलेले विविध प्रकारचे पुतळे व प्रतिकृती पाहण्याचा आनंद घेतला.
त्यानंतर मिनिडोअर मध्ये बसून सर्वजण चौल – बागमळा या ठिकाणी आले आणि श्री महालक्ष्मी मंदिराची टेकडी चढण्यास सुरुवात केली. टेकडी चढत असताना मोठ- मोठी झाडे, वेली, हिरवळींचे गालिचे पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. यात सुखद अनुभव म्हणजे तेथील शांतता व वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. प्रत्येकाने श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. नंतर सर्वांनी स्नेहभोजन केले. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गप्पागोष्टी करत, गाणी म्हणत भटकंती केली. महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेल्या विशाल अशा वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर झोके घेण्याचा मोह विद्यार्थ्यां प्रमाणे शिक्षकांनाही आवरता आला नाही.
सर्वजण पुन्हा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत पायऱ्या उतरून पायथ्याशी आले. त्यानंतर मिनीडोअर मध्ये बसून सर्वजण नागावच्या समुद्र किनाऱ्यावर आले. तेथील दुध फेसाळत उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, तेथील रुपेरी वाळू व हिरवीगार उंचच उंच सुरूची झाडे अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. अशा रीतीने वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटून सर्वजण सायकाळी ठीक ४.३० वाजता विद्यालयात परतले.
या सहलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वर्षा सहलीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सहलप्रमुख सचिन भंडारे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



