किल्ले कामनदुर्ग
ठाणे जिल्ह्यातील वसईजवळील कामनदुर्ग हा उंचीने २२०० फुट उंचीचा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. वसई- भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर बेलकुंडी गाव आहे. या गावातून कामनदुर्गकडे जाण्यासाठी पायवाट आहे.
११ व्या शतकात या किल्ल्याचा उल्लेख ‘कामवनदुर्ग’ या नावाने केलेला आढळतो. पूर्वी कल्याण-वसई यांच्यात उल्हास नदीतून व्यापार चालत असे. वसई येथून अनेक जहाजे उल्हास नदीतून कल्याणकडे रवाना होत. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरातील टेहळणी करण्यासाठी कामनदुर्गाची निर्मिती केली गेली.
वसई लढ्याच्यावेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात. उभ्या कड्यात खोदलेल्या पायऱ्या, कोरडी पाण्याची टाकी अशा प्राचीन खुणा बाळगत हा किल्ला उभा आहे. बेलकुंडी गावातून दोन डोंगरांच्या मागून डोकावणारा कामनदुर्गचा माथा दिसतो. हे दोन डोंगर पार करून आपण कामनदुर्गच्या कातळात खोदलेल्या पायऱ्याजवळ येतो. या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. समोर कामनदुर्गचा माथा आपले लक्ष वेधून घेतो. येथे कातळात खोदलेल्या ५ टाक्याचा समूह आहे. मार्च महिन्यापर्यंत यातील एका टाक्यात पाझरणारे जेमतेम पाणी असते. टाक्यांकडे जाताना वाटेत झाडाखाली दोन स्त्रिया कोरलेल्या एक दगडी मूर्ती असून त्यांच्या कानावर कुंडलांसारखी आभूषणे घातलेली आहेत.
टाक्यांच्या बाजूने एक वाट कामनदुर्गाच्या माथ्यावर जाते. या वाटेवर दोन अर्धवट ढासळलेले बुरुज व तटबंदीचे अवशेष आहेत. वाटेत एक सातवाहनकालीन कोरडे टाक लागते. त्याच्या पुढे पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो. येथे साचपाण्याचा तलाव असल्याचे दिसते पण यातही पाणी टिकत नाही. किल्ल्यावर पाण्याची एकूण अकरा कोरीव टाकी असून एकाही टाक्यात पाणी टिकत नाही. त्यामुळे कामनदुर्ग अनेक वेळा मोहिमांमध्ये यशस्वी ठरूनही अपयशाचा मानकरी ठरला. कारण पाण्याअभावी हा गड ब-याच वेळा सोडून द्यावा लागला. किल्ल्यावरून तुंगारेश्वर, गुमतारा हे किल्ले दिसतात. पश्चिमेला वसईची खाडी ते धारावी पर्यंतचा परीसर दिसतो. पाण्याअभावी ओस पडणारा हा एकमेव किल्ला आहे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



