जादुई तीन शब्द ‘मी आहे ना..’
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
जादुई तीन शब्द ‘मी आहे ना..’
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..! श्री स्वामी समर्थांचे हे वचन जसे श्रद्धाळू मनाला एक प्रकारचा विश्वास आनंद आणि सुख देतात. तसेच ‘मी आहे ना…!’ हे तीन शब्द आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला माणुसकीचा नात्यांचा आणि प्रेमाचा खंबीर आधार देतात. स्वतःचं स्वतःशी नातं जोडणारा आत्मविश्वास सुद्धा या तीन शब्दातूनच धीर देतो. तसं पाहिलं तर प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात त्याला आई-वडील, मित्र, गुरु किंवा साक्षात परमेश्वराकडून ही हे तीन शब्द संकटात सावली किंवा आधाराचा हात बनून साथ देतात. जरा बालपण आठवून बघा…! या छोट्याशा वाक्याने आपल्यात केवढी ताकद यायची, भीती दूर पळून जायची. लहानपणी अंधाराला घाबरलेलं मूल आईच्या कुशीत शिरतं त्यावेळी पाठीवरून हात फिरवत आई म्हणते, घाबरू नकोस बाळा… मी आहे ना…!
त्या क्षणात त्या मुलाचं भय नाहीसं होतं. एखादं मोठं धाडस करायचं असतं त्यावेळी बाबा म्हणतात, तू कर, जमेल तुला…, आणि नाही जमलं तर मी आहे ना…!.” शाळेत एखादा मित्र निराश होतो, हरतो, हताश होतो. त्यावेळी किंवा मोठेपणी सुखदुःखाच्या सागरात,एकटेपणाच्या वण व्यात सारं जग झोपले तरी जागा असेल मी तुझ्यासाठी..! तू फक्त हाक दे. मी साथ देईल… असे दुसरा मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, मी आहे ना..!आणि. दिशा हरवते विचारांची, अंधार दाटतो जीवनात त्यावेळी ज्ञान यात्रेचा दीप धारक पावलोपावली आपल्याला सांगत असतो, मी आहे ना..! सगळ्या जगाने साथ सोडली असता,तू विसरतोस मला.. तरी मी नाही विसरणार तुला! फक्त शांत ठेवून,श्रद्धेने साद घाल….तेव्हा मी आहे ना..! या शब्दाने तुला कसा प्रतिसाद देतो..असं देव ही म्हणत असतो भक्ताला…
माणसाला जेव्हा सगळं संपलंय, आता काहीच आणि कोणीच उरलेलं नाही,सगळं गमावून बसलोय,असं वाटतं.अशा वेळेस कुठेतरी खोल आतून एक आवाज येतो.., मी आहे ना…! हो… मी आहे ना..! एक विश्वास एक आधार आणि एक सळसळती आशा…! मलाही नोकरी करताना या सर्वांचा अनुभव आलाय…! कारण मी आहे ना..! हे तीन शब्द माझ्या डिक्शनरीत आणि जिभेवर कायमचं वास करतात…अर्थात ती मला सवयच होती…असं म्हणा हवं तर, शाळेत असताना माझ्या सहकाऱ्यांना ही मी कधीकधी एखाद्या प्रसंगी साथ देताना म्हणायचे, “काळजी नका करू, होईल सगळं व्यवस्थित. मै हू ना..! आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर हे शब्द मी अगदी सहज आणि सातत्यानेचं वापरायचे..! कधी कधी तर त्याची खास गरज नसायची, परंतु, त्यांच्यातील सकारात्मक आत्मविश्वास प्रखर करण्यासाठी ..!
कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असो वा राष्ट्रगीत गायन असो, स्नेहसंमेलन असो…अर्थात शालेय उपक्रमात त्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून असेल किंवा त्यांचा वैयक्तिक ही काही प्रॉब्लेम असू देत,मी त्यांना सहज म्हणून जायची,’ नको घाबरूस..! नको काळजी करू!, होईल सगळं व्यवस्थित…’! मैं हूँ ना…! आणि मग त्यांच्यात जो उत्साह संचारायचा.. त्यांचं काम पूर्ण आणि व्यवस्थित व्हायचं…तेव्हापासून मला हे शब्द ‘अमृताहुनी गोड संजीवन मंत्रासारखे महान..’ वाटू लागलेत. तुम्ही पण पहा… प्रयत्न करा.. आपले आई वडील आप्त-इष्ट,सगे-सोयरे त्यांच्या बाबतीत फक्त एवढेच म्हणा, मी आहे ना…! मग पहा हेच तुमचे शब्द तुम्हाला आनंद देतील आणि कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतील… आज, उद्या आणि नेहमीच…!
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर



