लाच देणे व लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे
पोलीस उपाधीक्षक सरिता भोसले यांचे प्रतिपादन
लाच देणे व लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे
पोलीस उपाधीक्षक सरिता भोसले यांचे प्रतिपादन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि ०६); जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधात जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने अँन्टी करप्शन विषयी माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत असताना पोलीस उपाधीक्षक श्रीमती सरिता भोसले यांनी प्रतिपादन केले कि, लाच देणे व लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे तसेच भ्रष्टाचार ही भविष्यातील फार मोठी गंभीर समस्या असणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, कोणीही कोणाला लाच देऊ नये आणि कोणाकडून घेऊही नये. तसेच अशी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास ती त्वरित अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालयास संपर्क साधून तक्रार करावी. तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाते अशी खात्रीही त्यांनी दिली. तसेच आपल्या भाषणाच्या शेवटी श्रीमती सरिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले कि,
भ्रष्टाचाराला नाही म्हणा.. राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा.
सदर व्याख्यान जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कायदा या तीन मूल्यांचा स्वीकार करून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक श्री. निशांत धनावडे आणि श्री. नारायण सरोदे यांनी लाचलूचपत प्रतिबंध कायाद्याची माहिती दिली व लाच घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्तींना 5 ते 7 वर्षांचा तुरुंगावास होऊ शकतो हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तर प्रा. अश्विनी आठवले यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज घरत, प्रा. विक्रांत झेंडे आणि एकूण 204 विद्यार्थी उपस्थित होते.



