‘फिर शम्मी ‘ एक आनंदमयी जीवन गाणे; मधुकर्णिका सासवडे
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
‘फिर शम्मी ‘ एक आनंदमयी जीवन गाणे; मधुकर्णिका सासवडे
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे : (दि २३)”डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित ‘फिर शम्मी ‘ हे पुस्तक म्हणजे आनंदमयी जीवन गाण्याचा पुन: प्रत्ययच ” असे प्रतिपादन मधुकर्णिका फौंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले. ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. शम्मीकपूर यांच्या जीवनपटावर आधारीत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी लिहिलेल्या ‘ फिर शम्मी ‘ ह्या पुस्तकाचे प्रकाशन मधुकर्णिका सासवडे यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात सासवडे बोलत होत्या.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी शम्मीकपूर यांच्या सिनेमातील गाण्यांवर आधारीत तरल , हळुवार कविता लिहिल्या आहेत, त्याचबरोबर शम्मीकपूर यांची सही -कुंडली -भाग्यांक याबाबत अभ्यासनीय विवेचन तसेच या पुस्तकाचे सुलेखन, मुखपृष्ठ हे सबकुछ.मधुसूदन यांचेच असल्याने हे पुस्तक निश्चितच वाचनीय ठरले आहे असेही मधुकर्णिका यांनी सांगितले.
मधुकर्णिका फौंडेशन ,एम प्रकाशन आणि साहित्य गौरव या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्यास ख्यातनाम गायिका लता म्हात्रे , काव्यशिल्प संस्थेच्या माजी अध्यक्ष आघाडीच्या कवयित्री ऋचा कर्वे , भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग तसेच प्रसिध्द गायिका माधुरी लेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 858 व्या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सा इंटरनॅशनल तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते लता म्हात्रे यांना ‘ यही है लता ‘ पुरस्कार , तर माधुरी लेंडे यांना संगीत संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी शम्मीकपूर यांच्या गाजलेल्या काही गाण्यांबरोबरच शम्मीकपूर यांच्या काही गाण्यांवर आधारीत स्वलिखित कविताही सादर केल्या.
गायिका लता म्हात्रे आणि माधुरी लेंडे यांनी लता दीदींची काही गाणी सादर करुन रसिकांची मने जिंकली. उत्तरार्धात डाॅ.घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खुल्या काव्यसंमेलनात ॠचा कर्वे, मधुकर्णिका सासवडे, नंदकिशोर गावडे, काव्यरसिका शाळिग्राम , मकरंद घाणेकर, प्रतिभा पवार , प्रा.प्रिती दबडे , किरण जोशी , श्रीनिवास तेलंग तसेच आदिंच्या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. लता म्हात्रे, मधुकर्णिका सासवडे आणि ऋचा कर्वे यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समारोपात मान्यवर कवी कवयित्रींना शब्दबहार काव्य पुरस्काराने डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.



