मनाची कवाडे; वसुधा नाईक
मनाची कवाडे
मन चंचल आहे. जसा एक भ्रमर चंचल असतो. या फुलावरून त्या फुलावर सतत फिरत असतो. आपल्या मनाचे रूपक सुद्धा त्याचप्रमाणे आहे. बहिणाबाईंनी पण याचे वर्णन केलेले आहे. “मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरून येई पिकांवर”. मन आपलं क्षणाक्षणाला भटकत असतं. आता भारतात असेल तर अमेरिकेत असेल.आत्ता शाळेत तर आत्ता घरी, मनाचा अथांग सागर सतत लाटारुपी विचारांमध्ये गुंतलेला असतो. मनाला शांतता अजिबात नाही. जो खरच मनाला बांध घालू शकतो, तो जीवनात सफल होऊ शकतो.
मनाला बांध घालणे म्हणजे काय? आपले मन आपल्या ताब्यात ठेवले. शक्य नाही हे माहित आहे. पण या मनाला योगा करून, प्राणायाम करून, मन शुद्ध विचारांचे माहेरघर ठेवून शांत ठेवणे, ताब्यात ठेवणे शक्य होते. तर हे मानवा शक्यतो चांगल्या विचारांची पेरणी करावी. आपल्या विचाराची मशागत करावी. वेळच्या वेळी तण उपटून काढून शुद्ध खत मनाला घालावे. म्हणजे आपण वाईट विचार मनातनं काढून टाकावेत, शुद्ध विचारांचे खत मनात पेरावे. मनाची अवस्था अथांग आहे. अथांग सागरासारखी. मनाला थोपवणे फार कठीण आहे. थोरांची, देवाची मनापासून सेवा आपण केली, तर कदाचित मन शांत होऊन मनाची ही जमीन सुपीक होऊ शकते.
‘मनाची नाती ही फार आनंददायक असतात’. प्रत्येक व्यक्तीतील सदगुण आपण आपल्यामध्ये घ्यावेत. याचा शाश्वत आनंद देखील घ्यावा. ब्रह्मज्ञानातील शब्द मनी पोहोचले तर मन खूप शांत होते. कोणतेही ध्यान करताना आपल्या आवडीचा देव, पशुपक्षी, आपल्या कुटुंबातील तुमची आवडती व्यक्ती, कोणीही नजरेसमोर आणा व ध्यानाला बसा. यासाठी मात्र इच्छाशक्ती हवी आहे. या ध्यानामुळे मन शांत होते. मेंदू कॉम्प्युटर सारखा चालायला लागतो. निर्णय क्षमता वाढते. मेंदू तल्लख राहतो. सकारात्मक विचार मनात येतात.
आपण सकारात्मक विचार सदा करावेत. मानवा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनाचे हे शिल्प आहे त्याची सुंदर मूर्ती घडू दे. मन ताब्यात ठेव. चांगले वाच. चांगले ऐक. चांगलेच बोल. तर मनाची अवस्था खूप छान राहील. मन बाहेर भरकटणार नाही. “मन एक वादळ”..! शांत करा त्याला प्राणायाम, योगाने आणि नेहमी हसतमुख रहा आनंदाने…!
मन जसे फुलपाखरू
मनाला कसे सावरू, सावरू…
वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे
==============



