“काव्यनिर्मितीने होतो मातृभाषेचा सन्मान”; – डाॅ. मंजुषा कुलकर्णी
"काव्यसुमने" कविता संग्रह प्रकाशन समारंभ साजरा
“काव्यनिर्मितीने होतो मातृभाषेचा सन्मान”; – डाॅ. मंजुषा कुलकर्णी
“काव्यसुमने” कविता संग्रह प्रकाशन समारंभ साजरा
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.(दि.6नोव्हे) “आपल्या मातृभाषेची गोडी अमृतासमान असते.जगात कुठेही गेलो आणि कितीही भाषा शिकलो तरी मातृभाषेचा लळा जिव्हाळा कधी संपत नाही. आणि जेव्हा आपल्या या प्रिय भाषेत काव्यनिर्मिती होते तेव्हा आपल्या मातृभाषेचा खरा सन्मान होतो”, अशा शब्दात प्रसिध्द कवयित्री, साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त लेखिका डाॅ मंजुषा कुलकर्णी यांनी आपले काव्य आणि भाषाविषयक विचार व्यक्त केले.
कालिंदी कुलकर्णी यांच्या “काव्यसुमने” या कवितासंग्रह प्रकाशन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमात डाॅ. मंजुषा कुलकर्णी यांचे शुभहस्ते “काव्यसुमने” संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर ज्येष्ठ कवी वसंत बिवरे, कवयित्री अमृता खाकुर्डीकर, लेखक देवा झिंजाड उपस्थित होते.
मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. म॔जुषा कुलकर्णी यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील साहित्यरचनेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून संस्कृत भाषेत देश विदेशात आपल्या प्राचीन संस्कृत वाड्.मयावर त्यांची व्याख्याने होत असतात.”काव्यसुमने” कविता संग्रह प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी संस्कृतमधील मार्मिक श्लोकांचे दाखले देऊन आपल्या प्राचीन वाड्.मयाची समृध्दी विशद केली.
“काव्यसुमने” लिहीणा-या कालिंदी कुलकर्णी यांच्या रचना बहिणाबाईंच्या रचनेशी साधर्म्य असणा-या आहेत, असे सांगून साहित्य निर्मितीच्या विविध प्रेरणांचे वर्णन केले. बहिणा बाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी जसे आपल्या आईच्या काव्य रचना आचार्य अत्रे यांच्या माध्यमातून प्रकाशात आणल्या तशाच कालिंदी ताईंचे सुपुत्र गिरीश यांनी आपल्या आईच्या रचनांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला, या शब्दात या हृद्य सोहळ्याचे कौतुक केले.नांदेड सिटी मध्ये आसावरी क्लब हाऊस इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमृता खाकुर्डीकर यांनी काव्यसंग्रहाचा परिचय करून देताना बीड जिल्हा परिषदेत अधिक्षक असलेल्या किलिंदी ताईंनी आपल्या काव्यछंद कसा जोपासला याची उदाहरणे देऊन त्यांच्या प्रासंगिक रचनांच्या काही ओळी उद्धृत केला व या रचनांमधील साधेपणाचा गोडवा नमूद केला. ज्येष्ठ कवी वसंत बिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आईमध्ये एक शिक्षिका असते, ती आपल्या मुलांना सर्वार्थाने घडवत असते असे सांगून प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक व आईचे स्थान सर्वश्रेष्ठ असते, असे सांगितले. देवा झिंजाड यांनी त्यांची “आई” ही कविता सादर केली.
कार्यक्रमात सुरवातीला संपदा कावसानकर व मंजिरी कुलकर्णी यांनी स्वागत गीत गायन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. सतीश कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुदाम जोशी यांनी उपस्थितांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.मिलींद दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रकाशन समारंभ निमित्त कृतज्ञता निधी म्हणून कुलकर्णी कुटूंबियांच्या वतीने ‘सृजन प्रतिष्ठान’ व ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ पुणे यांना निधी प्रदान करण्यात आला. शिल्पा,मंजिरी,अंजली यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



