माझी ‘काव्यसाधना’ एक मनातील उत्कंठा
संध्या मनोज पाटील भरूच अंकलेश्वर,गुजरात
माझी ‘काव्यसाधना’ एक मनातील उत्कंठा
गुरुकृपेची आराधना..
फलित झाली काव्यसाधना..
अर्पण तुझे तुलाच गुरुदेवा..
घडावी निरंतर अशीच शब्दसेवा..
दिनांक ७ में रोजी छत्रपती संभाजी नगरीत संपन्न झालेला अदभुत सोहळा. तो अविस्मरणीय दिवस पुन्हा आठवला आणि लक्षात आले की जे महत्वाचे आहे तेच बाकी राहिले, आणि ते म्हणजे आभार वंदना. मी कार्यक्रमाच्या दिवशी आभारीय मनोगत लिहून आणले होते तरी ते पूर्णपणे वाचून व्यक्त होऊ शकले नाही. त्यासाठी मी शिलेदारांची माफी मागते. माझ्या पुस्तकाबद्दल सांगण्याआधी मी मुख्य संपादक, समूहाचे वटवृक्ष आदरणीय राहुल पाटील सर आपले मनःपूर्वक आभार मानते. मी ह्या समूहात नसते तर माझ्या नावापुढे “कवयित्री” म्हणून माझी मलाच ओळख झाली नसती. शिलेदार समूहात मी क,ख,ग,घ पासून शिकत येतेय आणि शिकतच राहणार.
ह्या समूहातील सर्व प्रशासक,सहप्रशासक,परीक्षक,आणि कवी/कवयित्री ताई दादा आपणा सर्वांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आता थोडं सुखावलेल्या मनाचे बोल. आदरणीय पद्मताईजी वाखुरे मॅडम, आ.अरविंदजी सर, आ.स्वातीताई अशा दिग्गज प्रतिभावंत व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात माझ्या पामराचा पहिलावहिला काव्यसंग्रह ‘काव्यसाधना’ प्रकाशित झाला हे एखाद्या स्वप्ना सारखेच आहे. त्यासाठी मी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, मुख्य प्रशासक, संपादक आदरणीय राहुल पाटील दादांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या अपार मेहनतीने, सहकार्याने आज हे पुस्तक आपल्यासमोर आले आहे. तसेच आपल्या कार्यकारी संपादिका, मुख्य परीक्षक आदरणीय सौ.सविताताई पाटील-ठाकरे यांचेही खूप आभार मानते की त्यांनीही व्यस्तेतून वेळोवेळी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे.
माझ्या पुस्तकाला खऱ्या अर्थाने ज्या शब्दसुमनांनी गंधित केले, ते म्हणजे सोज्वळ, सात्विक मनाच्या आदरणीय सौ.स्वातीताई मराडे यांच्या प्रस्तावनेने. स्वातीताईची प्रस्तावना म्हणजे माझ्या निर्जीव पुस्तकात श्वास ओतणे असेच आहे. त्यामुळे मी त्यांची हृदयस्थ आभारी आहे. तसेच ह्या भव्यदिव कार्यक्रमाचे आयोजक, शब्दप्रभू आदरणीय विष्णूजी दादासाहेब संकपाळ… दादांच्या प्रोत्साहनामुळे हे पुस्तक तयार झाले आणि त्यात दादांच्या शुभेच्छा म्हणजे माझ्या भावविश्वास नवसंजीवनी मिळणेच जणू…. म्हणून दादांचेही आभार मानावे तितके कमीच आहेत.
तसेच….चांदण्या रात्रीस जसे तारका चमचम करीत नभास तेजोमय करतात त्याप्रमाणे आपल्या गोड, स्मित हास्यकारा आदरणीय सौ.तारकाताई रुखमोडे यांच्या अप्रतिम शुभेच्छा माझ्या पुस्तकाला लाभल्या त्यांचेही मी आभार मानू इच्छिते. आमचे वर्गमित्र श्री.महेन्द्र पवार जे उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनीही वेळ काढून माझ्या पुस्तकाला शुभेच्छासुमनांनी गंधित केले त्यांचेही मनःपूर्वक आभार मानते. आता थोडक्यात पुस्तकाविषयी…..सद्गुरूंविषयी मनात असलेला अपार श्रद्धाभाव, आजीप्रतीची आपुलकी, बाबांविषयीचा आदर, आईविषयी ममत्व, निसर्गासाठी कृतज्ञता, मुक्या जीवासाठी हळवे संवेदन..असा एकेक भाव मनात जागा होताच त्यांना शब्दरूप देऊन व्यक्त होण्याची धडपड म्हणजे माझा ‘काव्यसाधना’ हा काव्यसंग्रह होय.
मराठीचे शिलेदार समूहात मी दाखल झाले आणि कवीमनाला गती मिळू लागली. परमेश्वराने दिलेले हे ‘पुनरपि’ आयुष्याचे वरदान. या छंदात अधिकाधिक रमत गेले आणि याचीच परिपूर्ती झालेली आपणास निश्चितपणे पहायला मिळत आहे. माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला याचा मनापासून आनंद होत आहे. मला काव्याला अलंकारिक शब्दसौंदर्याने नटवता येत नसले, तरी शब्दातील साधेपणाही आशयघन करत प्रामाणिकपणे साकारण्याचा मी प्रयत्न केला आहे.
त्यामुळेच मुक्तछंदात असणाऱ्या या रचना वाचकांच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचतील अशी आशा करते. कुठे मार्मिकतेचे कोंदण देत, तर कुठे निसर्गरूपकांचा वापर करत विविध भावभावना मी टिपल्या आहेत. आपणही याच भावनेने त्यातील संवेदन समजून घ्यावे आणि यदाकदाचित कुठे अनवधानाने माझ्या भावना मांडण्यास कमी पडले असेल तर, आपले मार्गदर्शन मला मोलाचेच ठरेल. पुनश्च आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते.. खूप धन्यवाद. सर्व आदरणीय सहकवींचे पुस्तक प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक खूप अभिनंदन.
संध्या मनोज पाटील
भरूच अंकलेश्वर,गुजरात



