किल्ले दुर्गाडी किल्ला; स्वाती मराडे
किल्ले दुर्गाडी किल्ला
‘कल्याण’ शहर उल्हास नदी व खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे. याच व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी दुर्गाडी किल्ला व कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा तसेच स्थानिक आगरी समाज यांच्या सहकार्याने राजांनी शेकडो वर्षांपूर्वी केलेली आहे. बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते.
‘उल्हास’ नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी ‘भातसाई’ नदी, तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळू नदी येऊन मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.कल्याण बंदर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे. शिर्के सातवाहन राजांनी कल्याण बंदर आणि दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मराठा सातवाहन साम्राज्याचे पहिले आरमार, नौसेना, समुद्रीसेना, बंदर स्थापन केले. त्याचबरोबर कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर परिसरामध्ये सुसज्ज असावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला दुरुस्ती करण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ला दुरुस्ती पाया खोदतांना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले.
दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीचीच कृपा. दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करीता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात असे. येथे गणेशाची मूर्ती आहे. दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे. मंदिराजवळ गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
मुख्य सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



