दोन विधवा आईंच्या संघर्षातून लेखनाला प्रेरणा
चंद्रकांत तायडे : प्रकाशाच्या वाटा
दोन विधवा आईंच्या संघर्षातून लेखनाला प्रेरणा
चंद्रकांत तायडे : प्रकाशाच्या वाटा
वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे
छत्रपती संभाजीनगर : लहानशा खेडेगावातून सुरू झालेला माझा प्रवास संघर्ष, वेदना आणि जिद्दीने भरलेला आहे. फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव या गावाचा मी रहिवासी. अवघ्या वयाच्या अकराव्या वर्षी कॅन्सरसारख्या गंभीर आजारामुळे वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या जाण्याने घरात दोन विधवा आई, एक धाकटी बहीण आणि मी असा संसार उभा राहिला. आधार हरपलेला, परिस्थिती प्रतिकूल आणि भविष्य अनिश्चित असताना आमचा खरा संघर्ष सुरू झाला. पोरकेपणाची जाणीव, हलाखीची परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शिक्षणासाठीची सततची धडपड या सगळ्यांतून जीवनाची प्रचंड दमछाक झाली. अनेकदा परिस्थितीने खचवण्याचा प्रयत्न केला, पण आईंच्या संघर्षाकडे पाहून उभं राहण्याचं बळ मिळालं. त्यांचे कष्ट, सहनशीलता आणि न डगमगणारी जिद्द हेच माझ्यासाठी प्रेरणेचे स्रोत ठरले. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत शिक्षण पूर्ण करताना लेखनाची ओढ वाढत गेली. अनुभव, निरीक्षण आणि जीवनाने दिलेल्या जखमा शब्दांत उतरू लागल्या. मला वाचनाची सवय जडत गेली आणि अनुभव सोबतीला होते. आयुष्यातील गुदमरलेले श्वास मी कागदावर लिहिण्याचा प्रयत्न केला.आणि त्यातूनच माझं पहिलं पुस्तक ‘प्रकाशाच्या वाटा’ नावारूपास आलं. जरी माझ्या पुस्तकांचा आशय वेगळा असला, तरी लेखनामागची प्रेरणा ही संघर्षातूनच मिळाली. शब्दांमधून स्वतःचा शोध घेण्याचा आणि समाजाशी संवाद साधण्याचा मार्ग सापडत गेला. आज वयाच्या अवघ्या पंचविशीत मी स्वलिखित, अनुवादित आणि संपादित असे दहा ग्रंथ प्रकाशित केले आहेत. शून्यातून सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी पोहोचला आहे, याचे समाधान आणि आनंद वाटतो. संघर्षाने घडवलेला हा प्रवास केवळ माझा नसून, परिस्थितीशी झुंज देणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आहे, अशी माझी भावना आहे. माझा तरुणांना एकच संदेश आहे, “कुठल्याही परिस्थितीत खचू नका. अडचणी येणारच, पण आत्मविश्वास, धाडस आणि सातत्य ठेवून त्यांना सामोरे जा. परिस्थितीवर मात करून जिंकण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते.” संघर्षातून उमललेलं हे यश मी तुमच्यासारख्या प्रेमळ रसिकांना अर्पण करतो.



