माझे आवडते शिक्षक
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर
माझे आवडते शिक्षक
काल कळ्या, आज फुले झाल्या सगळ्या, कशा उमलल्या? कुणी हसविल्या? हासत बसल्या कशा कळ्या सांगा मला सगळ्या. ! याचं सगळं श्रेय द्यायचे असेल तर ते द्यावे लागते आपल्या शिक्षकांना. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेलं नाव म्हणजे गुरुजी, सर, बाई, मॅडम.. आणि गुरु.. हे एक अतूट नातं. शिक्षण, शाळा विद्यालय आणि महाविद्यालय यांच्याशी असलेल्या ‘गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी’ म्हणणारे येशूचे शिष्य, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना तसेच शिखांचे धर्म संस्थापक गुरुनानक या सर्वांना आपण गुरूच मानतो. तसेच माझे शिक्षक हे ही माझे गुरू… त्यांना प्रणाम!
खरं तर माझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक शिक्षक मला आवडतात. परंतु त्यातल्या त्यात मला अभिमान वाटतो माझ्या पहिली ते चौथीच्या वर्गाला शिकवणाऱ्या मराठीच्या शिक्षकांचा. ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आले आहे. त्यांनी मला क पासून ज्ञ पर्यंत चे अक्षर गिरवायला शिकवले. ज्या हाताने चुकीबद्दल मार दिला त्याच हाताने प्रेमाने शाबासकीचा हात फिरवला. त्यामुळे त्या मार देण्याचं काही वाटलं नाही. माणसाच्या जीवनात प्रथम गुरुचे स्थान आहे ते आईला, हे ही विसरून चालत नाही.
प्राथमिक शाळेतील गुरुजी, शिक्षक आपली कोनशिला पक्की करून कळस बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या शाळेत पाठवतात. माझ्या या शिक्षकांनी ही तेच केलं पण त्या अगोदर त्यांनी रंग, गंध,रस,स्पर्श, ध्वनी या पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना माझ्या मनात जागृत केल्या. शिक्षक हा एक वसा आहे. घेतला वसा मी कधी टाकणार नाही हे त्यांच्या कृतीतून जाणवलं. त्यांच्यामुळे माझ्या अंगी अधीर होण्याचं धैर्य., धीर धरण्याची कला आणि त्यासाठी जागवला दृढ विश्वास आणि श्रद्धा. म्हणूनच माझे ते शिक्षक मला खूप खूप आवडतात.
आज मी इथे जी बोलते आहे ते त्यांच्यामुळेच. कारण त्यांनीच मला वक्तृत्व कलेचे धडे गिरवून घेतले आणि कुठल्याही विषयाची मांडणी उच्चार,उभे राहण्याची पद्धत आपले मत मुद्दे उठावदार पणे मांडण्याची रीत याबद्दल माझ्याकडून तयारी करून घेतली. सभाधीटपणा ओघवती शैली, स्पष्ट शब्द उच्चार हे वक्तृत्व गुणही त्यांच्यामुळेच मी आत्मसात करू शकले, जे सत्य आणि न्याय्य आहे त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा व ऐकाव जनाचं अगदी सर्वांचं. पण गाळून घ्यावं ते मनाच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकस तेवढच करावं. हेही या शिक्षकांच्या मुळे मी शिकले नेहमी आनंदी राहा इतरांना आनंदी करा.
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ नसतात स्वार्थी राजकारणी धूर्त असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे ही असतात. ‘जसे असतात टपलेले वैरी तसेच असतात नाती जपणारी मित्र’. हे सुद्धा याच शिक्षकांमुळे शिकले आनंदही संयमाने व्यक्त करायला आणि द्वेष मत्सर या पासून दूर राहायला शिकवले. ते म्हणत की,’ “मी एक शिक्षक आहे शिक्षण हाच माझा स्वधर्म आहे विद्यार्थी हे माझे दैवत आहे, शाळा हे माझे मंदिर आहे धडपडही माझी पूजा आणि दुरितांचे तिमिर जावो ही प्रार्थना.!” समाजाचा आशीर्वाद हाच आमचा प्रसाद. माझ्या या शिक्षकाची आणि प्रत्येक शिक्षकांची हीच अपेक्षा असते की माझा विद्यार्थी हा वायफळ जाऊ नये, त्याचे जीवन हे उत्तरोत्तर फुलत रहावे, त्याच्या घरी सुखसमृद्धी नांदावी. म्हणून त्यांनी मला जे शिकवलं या ज्ञानमंदिरा जे दिलं त्या मंदिराला मी कधीच विसरू शकणार नाही. ‘धन्य ती माझी शाळा आणि धन्य ते माझे शिक्षक’.
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
============



