मनातील विचारांचे काहूर शांत करू या..!!
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे
मनातील विचारांचे काहूर शांत करू या..!!
प्रत्येकजण पहाटे पहाटे उठून नोकरीसाठी तयार होतो. अनेक विचारांचे काहूर माजलेले असते. विचारांची शृंखला संपतच नाही. घरातील स्त्री सर्वांच्या डब्याची चिंता करत असते. मुलांना डब्यात काय देऊ? पतीला डब्यात काय देऊ? घरामध्ये स्वयंपाक काय करू? इतर काम करताना माझा किती वेळ जाणार आहे? माझ्या स्वतःसाठी मला वेळ मिळणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये असतात. विचारचक्र चालूच असतं. नोकरीला जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज मी वेळेवर पोहोचेल की नाही? गर्दी लागेल का? ट्राफिक जाम नसेल ना? बॉस काय म्हणेल? आजची सर्व कामे होतील की नाही? अशा अनेक विचारांचे काहूर मनामध्ये घेऊन घरातल्या अडचणींना सामोरे जावून ही मंडळी जॉबला पोहोचतात.
अगदी पहिलीतल्या मुलापासून ह्या विवंचना असतातच. पहिलीचं मूल म्हणतोय, ‘अरे माझा अभ्यास झाला नाही’. उद्या टीचर काय म्हणेल रागवेल का मारेल का? अनेक प्रश्न ह्या छोट्या मुलांच्या डोक्यात असतात. असेच हे विचारांचं सत्र दिनभर चालू असतं. घरातील सर्वजण असू देत किंवा आणखी कोणी असू देत. प्रत्येकाच्या मनामध्ये कोणता ना कोणता विचारांचा संभ्रम खूप माजलेला असतो आणि त्यामुळे तो खूप विवंचनेमध्ये असतो. बऱ्याचदा या विचारांमुळे त्याला पुढे काय करावे हे सुचत नाही. मग अशा वेळेला त्यांनी काही वेळ आपले विचार बाजूला ठेवावेत. सांगणं सोपं आहे प्रत्यक्ष करणे कठीण आहे.
आपले विचार दिवसभर काही संपतच नाहीत. मग अशा वेळेला आपण झोपताना काही मिनिटं आज काय चांगलं केलं हा विचार करावा. आज आपल्यापासून कोणाला मदत झाली. याचा विचार करावा. आपल्यामुळे आज किती जणांना यश प्राप्त झालं. आपण काय केलं. चांगले ते वेचायचे आणि वाईट विचारांना तिलांजली द्यायची . छान शांत गीतांचा मनमुराद आनंद घ्यायचा. मग तुम्ही व्हिडिओ सॉंग पहा किंवा रेडिओ लावून ऐका. आजकाल कारवा हा रेडिओचा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये जवळजवळ 5000 गाणी असतात. खूप छान फील होतं ही जुनी गाणे ऐकल्याने. मन शांत होतं. काही वेळा विचार पूर्ण बाजूला होतात.
जर तुम्हाला चित्रकला आवडत असेल, तर चित्रकलेचा मनमुराद आनंद घ्या. चित्र काढा मन शांत ठेवा. चित्र रंगवा. जर तुमच्या आवडीचा पिक्चर बघण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत असेल तर निवांत तो पिक्चर लावा. त्यामध्ये मन रमवा. थोडासा प्राणायाम करावा प्राणायाम केल्याने सुद्धा मनातील विचारांचे काहूर बाजूला सरते. अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही दिवसभरातले विचार बाजूला ठेवून आपण हे कार्य केले तर किमान आपलं मन नक्कीच शांत होतं. मनातले विचार बाजूला ठेवून जर का आपण झोपलो तर शांत चित्ताने झोप लागते. झोप शांत झाली की, दुसरा दिवस उत्तम उजाडतो.. ‘मन शांत होते संगीताने, मन शांत होते आवडीचे सिनेमा बघितल्याने. मन शांत होते आपल्या आवडीचे कोणतेही कृत्य केल्याने.’ अशा प्रकारे आपल्या विचारांना आपण बाजूला ठेवू शकतो.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे



