निसर्गराजा: त्यागमूर्ती महान कर्मयोगी; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

निसर्गराजा: त्यागमूर्ती महान कर्मयोगी; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
निसर्ग म्हणजे सृष्टीच्या सौंदर्याचा अखंड उत्सव. तो पृथ्वीचा श्वास व जीवनाचा आधार आहे. त्याच्यामुळे जग सुंदर दिसते. त्याच्या कुशीत माणूस शांतता शोधतो. उगवता सूर्य आशेची किरणे घेऊन येतो. पहाटेचे धुके पृथ्वीला शुभ्र शाल पांघरते. दवबिंदू मोत्यांसारखे चमकत सार्या सृष्टीला सजवतात. पक्ष्यांची किलबिल दिवसाचे स्वागत करते. वारा मंदपणे गाणी गुणगुणतो. झाडांची पाने त्याच्या तालावर डोलतात. फुलांचा सुगंध वातावरण भारून टाकतो.
रंगीबेरंगी फुलपाखरे सृष्टीला शोभा आणतात. नद्या खळखळत जीवनगाणी गातात. डोंगर, पर्वत अभिमानाने उभे असतात. दऱ्या हिरवाईची ओढणी पांघरतात. धबधबे मुक्तपणे झेपावत राहतात. आकाश निळ्या रंगाची विशाल चादर पांघरते. ढग कल्पनांचे महाल उभे करतात. पावसाचे थेंब धरतीला नवजीवन देतात. मातीचा सुगंध मनाला वेड लावतो. वनराई पृथ्वीचे सौंदर्य खुलवते. वेली झाडांना प्रेमाने बिलगतात. अथांग सागर विशालतेचा धडा शिकवतो. लाटा किनाऱ्याशी खेळत राहतात.
चंद्र रात्रीला रुपेरी तेज देतो. चांदण्या नभात स्वप्ने पेरतात. ताऱ्यांची आरास मन हरवून टाकते. ऋतू नवनवीन रंग घेऊन येतात. वसंत फुलांचा उत्सव साजरा करतो. ग्रीष्म सहनशीलतेचा संदेश देतो. वर्षा नवजीवनाची चाहूल आणते. शिशिर संयम शिकवतो. संपूर्ण सृष्टीचा अधिपती म्हणजे निसर्ग. मानव, प्राणी, पक्षी,वनस्पती, नद्या, पर्वत, समुद्र, आकाश, सूर्य, चंद्र आणि ऋतू यांचा सुंदर संगम म्हणजे निसर्ग. म्हणूनच निसर्गाला प्रेमाने “निसर्गराजा” असे संबोधले जाते.
निसर्ग प्रत्येक जीवाला समान प्रेम देतो. त्याच्याकडे दयाळूपणा, उदारता संयम, सौंदर्य आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आहे. त्याच्याकडे करुणा आहे. त्याच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. विचार निर्मळ होतात. जीवनाला नवी दिशा मिळते. निसर्ग जीवनाचे खरे तत्त्वज्ञान सांगतो. आज मात्र माणसामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. जर आपण आता जागे झालो नाही; तर भविष्य अंधकारमय होईल. म्हणून प्रदूषण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवला पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे.निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
निसर्ग हा केवळ भौतिक संपत्तीचा स्रोत नसून तो महान गुरुही आहे. निसर्गराजा एक महान कर्मयोगी आहे असे म्हणणेच योग्य ठरेल. आजच्या सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘निसर्गराजा’ विषय निसर्गाची जपणूक करून जाणीव निर्माण करणारा आहे. असे वैचारिक विषय देण्याबद्दल आदरणीय सरांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सर्व शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्या़ंचे अभिनंदन! राहुल सरांनी मला काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



