युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीत जे. एस. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीत जे. एस. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
रायगड (दक्षिण) विभागात सर्वाधिक १६ पारितोषिकांची कमाई
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग, (दि ०६): विद्यार्थी विकास कक्ष, मुंबई विद्यापीठ आणि पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या रायगड (दक्षिण) विभागीय फेरीत जे. एस. एम. महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत २६ स्पर्धांपैकी तब्बल १६ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत विभागात सर्वाधिक यश संपादन केले. हा युवा महोत्सव दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथे उत्साहात पार पडला.
या महोत्सवात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, कोलाज, पोस्टर मेकिंग, कार्टूनिंग, मूर्तीकला आदी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
जे. एस. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेली पारितोषिके पुढीलप्रमाणे :
वक्तृत्व (मराठी) – प्रथम
एकांकिका (मराठी) – प्रथम
एकपात्री अभिनय (मराठी) – प्रथम
स्किट (हिंदी) – द्वितीय
नाट्यसंगीत – द्वितीय
वाद्यवादन (तालवाद्य) – द्वितीय
रांगोळी – द्वितीय
वक्तृत्व (इंग्रजी) – द्वितीय
वादविवाद (हिंदी) – द्वितीय
कथाकथन (मराठी) – तृतीय
शास्त्रीय नृत्य (Classical Dance) – उत्तेजनार्थ
भारतीय लोकनृत्य (Indian Folk Dance) – उत्तेजनार्थ
भारतीय समूहगीत (Indian Group Song) – उत्तेजनार्थ
भारतीय सुगम गायन (Indian Light Vocal) – उत्तेजनार्थ
पोस्टर मेकिंग – उत्तेजनार्थ
कोलाज – उत्तेजनार्थ
या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे तसेच महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक, दिग्दर्शक आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
युवा महोत्सवात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड होईल, असा विश्वास मा. ॲड. डाॅ. गौतमभाई पाटील यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाने दिलेला सातत्यपूर्ण पाठिंबा, उपलब्ध करून दिलेल्या सुविधा तसेच प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन करता आल्याची भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनीही आनंद व्यक्त करत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.



