बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, ( दि ९): वर्षा ऋतू म्हटलं की सृष्टीची ऐट काय विचारता…..! संपूर्ण निसर्ग खुलून नटलेला असतो आणि यात वर्षासहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सकाळी ठीक ९.०० वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयातून मिनीडोअर मध्ये बसून मौज मजा करत, गाणी म्हणत अलिबाग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व सजलेल्या थळ टेकडी या ठिकाणी पोहोचले. टेकडी चढून तेथील श्रीदत्त मंदिरात जाऊन प्रत्येकाने श्रीदत्तांचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.
त्यानंतर पुन्हा मिनिडोअर मध्ये बसून सर्वजण नारळ, फोफळीच्या बागांनी नटलेल्या व सजलेल्या वरसोली या गावातील श्री खंडोबा मंदिर या ठिकाणी पोहोचले. मंदिराची अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य वास्तू पाहून प्रत्येकाचे मन मोहून गेले. मंदिरांमध्ये जाऊन प्रत्येकाने श्री खंडोबाचे दर्शन घेतले.
त्यानंतर मिनीडोअर मध्ये बसून सर्वजण कुरुळ या गावी आले आणि रसाणी टेकडी चढण्यास सुरुवात केली. रसाणी टेकडी चढत असताना मोठ- मोठी झाडे, वेली, हिरवळींचे गालिचे पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. यात सुखद अनुभव म्हणजे तेथील शांतता व वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. रसाणी टेकडी चढून प्रत्येकाने श्री दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तांचे दर्शन घेतले. नंतर सर्वांनी स्नेहभोजन केले. त्यानंतर आजूबाजूच्या अतिशय सुंदर अशा परिसरात गप्पागोष्टी करत, गाणी म्हणत भटकंती केली. सर्वजण पुन्हा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत टेकडी उतरून पायथ्याशी आले.
त्यानंतर मिनिडोअर मध्ये बसून सर्वजण खंडाळा गावातील श्री साई मंदिर या ठिकाणी आले. प्रत्येकाने मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गप्पागोष्टी करत भटकंती केली. त्यानंतर मिनीडोअर मध्ये बसून सर्वजण वेश्वी गावातील श्री गोकुळेश्वर मंदिर या ठिकाणी आले. प्रत्येकाने मंदिरात जाऊन श्री गोकुळेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या शेजारी असलेल्या, सुशोभिकरण झालेल्या विस्तृत अशा तलावाच्या काठावरून गप्पागोष्टी करत भटकंती केली. मंदिराची अतिशय सुंदर वास्तू, तेथील अतिशय सुंदर आणि सुशोभित असा तलाव, तलावाच्या काठावरील सुंदर झाडे – झुडपे, वेली व फुललेली सुंदर फुले अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.
अशा रीतीने वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटून सर्वजण सायकाळी ठीक ५.०० वाजता विद्यालयात परतले. या सहलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वर्षा सहलीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



