नीतिमूल्यांचं पतन पाहून देवाला विचारावं वाटतं, आता तूच सांग काय करू?; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
नीतिमूल्यांचं पतन पाहून देवाला विचारावं वाटतं, आता तूच सांग काय करू?; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
माणसाचं जीवन सुखदुःखानं भरलेलं आहे. क्षणोक्षणी त्याला आव्हानांचा सामना करावा लागतो. संकटे आवासून समोर आलेली असतात. सध्याचं जग हे स्पर्धेचं आहे. यात टिकून राहण्यासाठी सर्वांनाच खूप प्रयत्न करावे लागतात. तरुणांना कधीकधी अपेक्षित यश मिळत नाही. वैतागून तो दैवाला किंवा देवाला दोष देऊ लागतो. आता तूच सांग? मी काय करू असा प्रश्न पडतो.
परवा माझ्या घरी माझी बालमैत्रीण आली. बोलता बोलता मी विचारलं, अग यंदा लेकाचं लग्न करणार आहेस ना? तर ती रडायलाच लागली. त्यानंतर तिनं जे सांगितलं ते अवाक् करणार होतं. तिचा मुलगा अमेरिकेत असतो. उच्चशिक्षित, तिथला ग्रीन कार्डधारक. नुकताच तो घरी आला होता म्हणे, त्याच्याबरोबर त्याचा अमेरिकन मित्र होता. मैत्रिणीनं मुलाजवळ त्याच्या लग्नाचा विषय काढला. काही मुलींचे फोटो दाखवले. तर तिचा मुलगा म्हणाला ” आई, मला मुलीशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मी माझ्या मित्राबरोबर सुखी आहे. सध्या आम्ही दोघं एकत्र राहत आहोत. यापुढे माझ्या लग्नाचा विषय प्लीज काढू नकोस.” मैत्रीण आणि तिचे मिस्टर अक्षरशः कोसळून गेले. मी कसंबसं तिचं सांत्वन केलं.
पाश्चात्य संस्कृतीचं विकृत आक्रमण, मन विषण्ण झालं ते ऐकून. जग कुठं चाललंय? नीतिमूल्यांचं पतन पाहून देवाला विचारावं वाटतं, आता तूच सांगशील का काय करायचं? आभासी दुनियेचा पगडा, दुभंगणारी नाती,पती पत्नी तील वृथा अहंकारामुळं येणारा दुरावा,वाढते घटस्फोट ,वृध्दांच्या प्रती दुर्लक्ष, त्यांची परवड, आपल्यांकडून नाकारलं जाणं, वाढते वृध्दाश्रम. खरंच समाजाची ही अधोगती बघवत नाही.
निसर्गाचे चक्र फिरले
भरघोस पीक हातचे गेले
काय करू देवा आता तूच सांग?
खरंच आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय दादांनी दिलेला ‘आता तूच सांग? हा प्रश्नार्थक विषय बहुआयामी आहे. शिलेदारांनी पण भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



