‘काव्ययोग’ तर्फे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला…!
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

‘काव्ययोग’ तर्फे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला…!
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: यशवंतराव चव्हाण आश्रम शाळा, गुळवे वस्ती, भोसरी येथे काव्ययोग काव्य संस्था, पुणेचे अध्यक्ष कवी योगेश हरणे तसेच गौरव पुंडे यांच्या माध्यमातून “कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला” हा सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात वसुधा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा वसुधा नाईक यांनी बालगीत सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी निर्मित केलेला “रमाची पाटी” हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
श्रीराम घडे यांनी ग्रामीण ढंगात लिहिलेले आईवरील गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांच्या गीताला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त साथ दिली.
श्री. लक्ष्मण शिंदे, निसर्ग कवी यांना काव्ययोग काव्य संस्थेच्या निमंत्रणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांना कविता कशी तयार करावी, कवितेचा विषय कसा निवडावा, आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून कवितेचे विषय कसे शोधावेत, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच “झाडाची आरती” आणि इतर निसर्गगीते विद्यार्थ्यांसमोर सादर करून त्यांना निसर्गकवितांचा आनंद घेता आला.
या कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली शाळेची विद्यार्थिनी रोहिणी चव्हाण. तिने लिहिलेल्या अनेक कवितांपैकी “बाबा” आणि “बहिण” या कविता उपस्थितांसमोर प्रभावीपणे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या साहित्यिक प्रतिभेचे कौतुक म्हणून वसुधा नाईक आणि लक्ष्मण शिंदे, निसर्ग कवी यांच्या हस्ते तिला पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संधी उपलब्ध करून देणारे यशवंतराव चव्हाण आश्रम शाळेचे संचालक, कवी व साहित्यिक श्री. संदीप राक्षे स्वतः उपस्थित राहिले. त्यांचे काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे,गौरव पुंडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद खोपडे यांनी केले, तर श्री. मनोहर कदम यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
एकंदरीत, “कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला” हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात कविता, साहित्य आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणारा आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा देणारा ठरला.



