अ.भा.साहित्य परिषदेच्या वतीने वि.स.खांडेकर यांची पुण्यतिथी साजरी
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
अ.भा.साहित्य परिषदेच्या वतीने वि.स.खांडेकर यांची पुण्यतिथी साजरी
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१ सप्टे(प्रतिनिधी) मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिध्द कादंबरीकार वि.स.खांडेकर यांची ४८ वी पुण्यतिथी कॉलेज रोडवरील वि. स. खांडेकर चौकातील पुस्तकांच्या शिल्पाजवळ भावपूर्ण वातावरणात नुकतीच साजरी करण्यात आली.
अ.भा.साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्याम भुर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना माधुरीताई म्हणाल्या, “मानवतावादी विचारांनीच श्रीमंती व गरीबी यातील दरी मिटेल यावर खांडेकरांचा दृढ विश्वास होता. उच्च जीवनमूल्य देणारे त्यांचे साहित्य आजच्या काळाशीही तितकेच सुसंगत आहे. खेडेगावात अध्यापन करीत असताना त्यांनी बिनपैशात असंख्य कल्पक उपक्रमातून लहान मुलांना अनुभवसमृद्ध केले होते”
प्रा.श्याम भुर्के यांनी वि. स. खांडेकर यांचा जीवनपट उलगताना काही खास किस्से श्रोत्यांना ऐकवले. “खांडेकरांचा जन्म सांगलीचा पण शिक्षण पुण्यात फर्ग्युसन काॅलेजमध्ये आणि अध्यापन शिरोडे गावात केले. “ययाती” कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले; आणि त्यांच्या “अमृतवेल” कादंबरीने तर अनेक वाचकांना जगण्यासाठी प्रेरणा दिली. सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना ते तिथे पाच दिवस आधी गेले. लहान मुलांची मिरवणूक काढून त्यांना संमेलनात सहभागी करून घेतले.”
या कार्यक्रमास डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ.विद्या शर्मा, श्री.अविनाश चाफेकर, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा.जोशी, गीता भुर्के, तृप्ती कुलकर्णी तसेच साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.



