किल्ले अशेरीगड; स्वाती मराडे-आटोळे
स्वाती मराडे-आटोळे
किल्ले अशेरीगड
ठाणे जिल्ह्यातील पालघर गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका. आता पालघर हा जिल्हा झाला आहे. बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील ‘अशेरीगड’ हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.
‘अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे’. १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. अशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. इथे आत व बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग केलेले आहेत. गुहेच्या वरच्या बाजूला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते.
याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी चीर व पुढे एक बांधीव बुरूज दिसतो. गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एस.टी. बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ कि.मी. वर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाच्या स्टॉपला उतरायचे. ‘खोडकोना म्हणजे अशेरी गडाच्या पायथ्याशी असलेल पाच-पंचवीस घर असलेलं छोटसं गाव’. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



