‘प्रत्येक माणसामध्ये माणुसकीचा दीप प्रज्वलित व्हावा..!!’
श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव, जि. जळगाव

‘प्रत्येक माणसामध्ये माणुसकीचा दीप प्रज्वलित व्हावा..!!’
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरला. आज सकाळी योगासने करून मोबाईल हातात घेतला आणि आदरणीय राहुल दादांचा “तुमचा फोटो पाठवा” असा संदेश वाचला. हा संदेश पाहून मनात उत्सुकता निर्माण झाली. कुठल्या चारोळीला सर्वोत्कृष्टचा सन्मान मिळाला असेल? आणि जेव्हा समूहात पाहिले, तेव्हा माझी ‘समाजरचना’ ही चारोळी सर्वोत्कृष्ट ठरल्याचे समजले. त्या क्षणी मन आनंदाने भरून आले.
“समाजरचना”
समतेच्या विचारांनी समाज फुलावा,
माणुसकीच्या नात्यांनी जीव जुळावा
भेदभाव विसरून हातात हात घ्यावा,
सुंदर समाजाचा नवा दीप पेटवावा.”
योगायोगाची सुंदर गोष्ट म्हणजे आज “दीप अमावस्या” पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी आपण घराची स्वच्छता करून दिव्यांचे पूजन करतो. ‘दिवा म्हणजे केवळ मातीचा प्रकाश नव्हे, तर तो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे’. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील अंधार दूर करून प्रकाशाचे स्वागत करतो, त्याचप्रमाणे आपल्या समाजातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा, भेदभाव दूर होऊन समतेची भावना वाढावी, नकारात्मकतेची जागा सकारात्मक विचारांनी घ्यावी आणि प्रत्येक माणसामध्ये माणुसकीचा दीप प्रज्वलित व्हावा, हीच या चारोळीमागची भावना आहे.
समाजाची खरी समृद्धी केवळ भौतिक प्रगतीत नसून ज्ञान, समता, बंधुता, माणुसकी आणि सकारात्मक विचारांची वाढ यात आहे. प्रत्येकाने आपल्या परीने एखादा छोटासा चांगला विचार, एखादे चांगले कार्य आणि एखादी सकारात्मक भावना समाजात रुजवली, तर नक्कीच सुंदर आणि संवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकते. माझ्या या छोट्याशा शब्दप्रयत्नाला परीक्षकांच्या मनात स्थान मिळाले आणि ‘सर्वोत्कृष्ट चारोळी’ म्हणून सन्मान मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. या सन्मानासाठी मुख्य प्रशासक व आयोजक आदरणीय राहुल पाटील सर, मुख्य परीक्षक, प्रशासक, माझी प्रिय सखी सवू ,पल्लवी ताई तसेच माझ्या लेखणीला प्रोत्साहन देणाऱ्या समूहातील सर्व सन्माननीय दादा, ताई यांचे मी मनापासून ऋणी आहे.
दीप अमावस्येचा दिवा प्रत्येक घरात तेवो,
ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात पसरू दे,
समतेची ज्योत प्रत्येक हृदयात प्रज्वलित होऊ दे,
माणुसकीची नाती अधिक घट्ट होऊ देत,
समाजरचनेचा नवा दीप सदैव तेवत राहू दे!
पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार…!!
श्रीमती सीमादेवी बेडसे
चाळीसगाव, जि. जळगाव
==========



