“जेथे नागरीक जागरुक जबाबदार, तेच शहर स्वच्छ रूबाबदार”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य'स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“जेथे नागरीक जागरुक जबाबदार, तेच शहर स्वच्छ रूबाबदार”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“गाडीवाला आया, घर से कचरा निकाल” खूप दूरवरून येणारे नेहमीचेच चिरपरिचित स्वर कानावर पडले आणि अंगणात खेळणाऱ्या निनाद ने, “अगं आई, कचरा गाडी आली” असे ओरडतच घरात धाव घेतली. स्वयंपाकघरात व्यस्त असलेली निशा गडबडीने हातातले काम सोडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवलेल्या दोन्ही बकेट उचलत रस्त्यावर आली. तोपर्यंत गाडी येऊन पोहचली होती. सोसायटीतील सर्व महिलांनी आपापल्या कचर्याच्या बकेट गाडीत खाली केल्या आणि गाडी पुढे सरकली.
आजकाल शहरातून वरील चित्र नियमित दिसते. बहुतेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी पण होते. मात्र आजही “स्वच्छ भारत, सुंदर भारत” सारखे अभियान राबविणाऱ्या देशातील मोठमोठ्या शहरात सार्वजनिक ठिकाणे कचर्याच्या ढिगाने व्यापलेली दिसतात. वेगवेगळे चौक, बसस्टॉप, काॅर्नर अशा ठिकाणी अघोषित कचरा डेपोच लोकांनी तयार केले आहेत. ज्यामध्ये ओला सुका कचरा एकत्रच असतो शिवाय काचा, फुटलेले बल्ब, प्लास्टिक वस्तू, लोखंडी भंगार अशा वस्तू बिंधास्त फेकलेल्या दिसतात. आणि त्यातच कुत्रे, गायी, डुकरे बिनबोभाट चरत असतात. अर्धा कचरा रस्त्यावर येत असतो. परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. अपघात होण्याची शक्यता पण असते. नव्हे होतातच..!
खरा प्रश्न पडतो की याला जबाबदार कोण? पालिका? ग्रामपंचायत? व्यवस्था? की बेजबाबदार नागरीक? एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, कचरा टाकणारे लोकच व्यवस्थेकडे बोट दाखवून मोकळे होताना दिसतात. अशा वेळी चार बोटे स्वतःकडेच असतात हे मात्र सोयिस्करपणे विसरले जाते. कचर्याची विल्हेवाट लावणे संबंधित व्यवस्थेची जबाबदारी जरूर आहे. मात्र त्या व्यवस्थेतही माणसेच आहेत. आणि नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीवर एक नैतिक जबाबदारी पण असते की, “माझा कचरा, माझी जबाबदारी” ठरवून दिलेल्या नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारचा कचरा योग्य ठिकाणीच टाकून आपले कर्तव्य चोख बजावणे.
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेला चित्र विषय आजच्या कचरा समस्येवर भाष्य करणारे आहे. चित्रात तरूण मुले दिसताहेत. आणि बस थांब्याचा परिसर दिसतो. एक निमवयस्क व्यक्ती प्लास्टिक पिशवीतून कांहीतरी वस्तू नेत असून. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर केळीच्या साली आणि इतर कचर्याचा ढिग दिसत आहे. अशा चित्रावर हायकू लेखन करताना सामाजिक आशय अभिप्रेत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे वर्तन, बेजबाबदारपणा, यावर मार्मिक भाष्य करता येऊ शकते. काही हायकूकारांनी तसा प्रयत्नही केला आहेच. हे चित्र, नागरिक आणि व्यवस्थेची अनास्था दर्शवणारे आहे.
हायकू काव्याच्या माध्यमातून आपण योग्य संदेश देऊ शकतो..प्रदूषण रोखणे, प्लास्टिक वापर टाळणे, कचर्याची सरमिसळ न करणे, कुंडीतच कचरा टाकणे अशा गोष्टीवर लक्ष वेधता येऊ शकते. शेवटी “ग्रामस्वच्छता अभियान” राबवण्यात नागरीकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. काही सामाजिक संघटना मात्र विशेष दिवशी साफसफाई मोहीम राबवतात. फोटोसेशन करतात. आणि पुन्हा “ये रे माझ्या मागल्या” असे चित्र सर्रास दिसते. कायदेशीर बंधने, आणि नैतिक जबाबदारी यांच्या संतुलनातून या समस्येवर मात करता येऊ शकते. सुजाण जबाबदार नागरीकच आपले शहर स्वच्छ, सुंदर रुबाबदार ठेवू शकतात.
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक, कवी, लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



