जे. एस. एम. महाविद्यालयात ‘English for Competitive Examinations’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जे. एस. एम. महाविद्यालयात ‘English for Competitive Examinations’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : जनता शिक्षण मंडळाच्या जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘English for Competitive Examinations’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील विविध घटकांचे योग्य आकलन व्हावे, परीक्षेतील प्रश्न सोडविण्याची कौशल्ये विकसित व्हावीत तसेच इंग्रजी भाषेवरील आत्मविश्वास वाढावा, हा या व्याख्यानाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. डॉ. गौतम पाटील आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून आपल्या करिअरच्या संधी वाढवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम. एस. सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेत इंग्रजी विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाला असलेले महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांनी या विषयाचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुभाष कदम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘English for Competitive Examinations’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे Grammar, Vocabulary, Synonyms and Antonyms, Sentence Correction, Error Detection, Reading Comprehension, Idioms and Phrases यांसारख्या विविध घटकांवर त्यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना केवळ पाठांतर न करता भाषेचा योग्य वापर समजून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. सुभाष कदम यांनी स्पष्ट केले. दररोज नवीन शब्दांचा अभ्यास करणे, इंग्रजी वर्तमानपत्रे व पुस्तके वाचणे, व्याकरणाचा नियमित सराव करणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. स्पर्धा परीक्षांमध्ये अचूकतेबरोबरच वेगालाही महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांनी नियमितपणे सराव चाचण्या सोडवाव्यात, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कपिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ. प्रवीण गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मार्गदर्शनपर व्याख्यानाला महाविद्यालयातील सुमारे 185 विद्यार्थी उपस्थित होते.



