“पानिपत विसरायचे नाही, पण पानिपत पुन्हा घडू द्यायचेही नाही”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे परीक्षण

“पानिपत विसरायचे नाही, पण पानिपत पुन्हा घडू द्यायचेही नाही”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण
दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेली याची गणना नाही, रक्तपात तर विचारू नका अक्षरशा पाट वाहिला रक्ताचा. पानिपतचा हा रक्तरंजित इतिहास वाचताना आजही अंगाला शहारे येतात. आज काळ बदलला. मानवाने विज्ञानाच्या सामर्थ्याने आकाशाला गवसणी घातली, समुद्राच्या तळाशी पोहोचला आणि अवकाशातही आपल्या अस्तित्वाची नोंद केली. पण दुर्दैवाने आजही माणूस माणसाच्या रक्तासाठी आसुसलेला दिसतो. प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या मानवाने जर माणुसकीच गमावली, तर त्या प्रगतीला अर्थ तरी काय? रक्तपात नको मानवा!
रक्ताचा प्रत्येक थेंब केवळ शरीरातून वाहणारा द्रव नसतो तर त्यामागे एक कुटुंब, असंख्य स्वप्ने, नाती आणि कोणाचीतरी प्रतीक्षा असते. रणांगणावर पडणारा सैनिक इतिहासाच्या पानावर कदाचित एक आकडा ठरतो पण त्याच्या घरासाठी तो संपूर्ण विश्व असतो. आपल्या इतिहासात पानिपतचा महासंग्राम याच वेदनेची ज्वलंत आठवण करून देतो. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाने महाराष्ट्राच्या असंख्य घरांवर दुःखाची सावली पसरली. रणभूमीवर पराक्रमाची परिसीमा गाठली गेली; पण त्या पराक्रमाची किंमत हजारो जीवांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी मोजली.
म्हणून पानिपत आपल्याला केवळ शौर्याची गाथा सांगत नाही; ते एक गंभीर प्रश्नही विचारते. “युद्ध जिंकले तरी माणुसकी हरली, तर त्या विजयाचे मोल काय?” इतिहास बदलता येत नाही पण इतिहासातून धडा घेऊन भविष्य नक्कीच बदलता येते. मतभेद असतील, विचारभेद असतील, संघर्ष असतील; परंतु संवादाचा मार्ग उपलब्ध असताना रक्तपाताचा मार्ग का स्वीकारावा? खरे शौर्य शस्त्र उचलण्यात नाही; शस्त्र उचलण्याची वेळच येऊ नये यासाठी संवाद साधण्यात आहे. खरा विजय दुसऱ्याचा पराभव करण्यात नाही तर शत्रुत्वाचा पराभव करण्यात आहे.
धर्म, जात, भाषा, प्रदेश आणि राष्ट्र यांच्या सीमा वेगळ्या असतील पण अश्रूंची भाषा एकच आहे आणि रक्ताचा रंगही एकच आहे. आईचे दुःख कोणत्याही धर्माचे नसते आणि अनाथाच्या वेदनेला कोणतीही सीमा नसते. म्हणून पानिपत विसरायचे नाही, पण पानिपत पुन्हा घडू द्यायचेही नाही. इतिहासाच्या रक्तरंजित पानांकडे केवळ अभिमानाने नव्हे, तर विवेकाने पाहिले पाहिजे. आज गरज आहे तलवारीपेक्षा संवादाची, द्वेषापेक्षा करुणेची आणि संघर्षापेक्षा सहअस्तित्वाची.
“रक्ताने भूमी लाल होते
पण माणुसकी काळवंडते.
म्हणून… रक्तपात नको मानवा,
माणसाला माणूस म्हणून जगू दे”
आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘रक्तपात नको मानवा’ हा अत्यंत गंभीर विषय दिला. या विषयाला केवळ सकारात्मक ही एकच बाजू होती. तेव्हा सर्वांनी आपापल्या परीने खूप सुंदर काव्य मैफिल सजवली. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन साठी अनंत कोटी शुभेच्छा. धन्यवाद.
प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, दीव दमण
मुख्य परीक्षक/लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



