नागपंचमी: एक ऐतिहासिक चिंतन
डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, हिंगणा रोड नागपूर

नागपंचमी: एक ऐतिहासिक चिंतन
“वंश “ ही संकल्पना कशी आली? कशी जगभर पसरली असावी? याचे जर आपण शोध चिंतन केले तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रागैतिहासिक काळात मानव प्राणी हा भारतीय उपखंडात जंबुद्वीपात उगम पावला आहे ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. जेथे स्थापन झालेल्या संस्कृती नुसार सर्वत्र गणराज्ये निर्माण केल्या गेलीत. ती समस्त गणराज्ये ही लोकशाही पद्धतीने चालविल्या जात. अर्थात त्यामुळे त्याकाळी ही आजच्या सारखेच विविध गण (आजच्या भाषेत पक्ष )असून त्यांच्यात देखील वैचारिक मतभेद असणारच. आणखीन महत्वाचे म्हणजे त्या काळी निर्भेळ लोकशाही अस्तीत्वात होती. त्यामुळेच जंबुद्विपासारख्या खंडप्राय प्रदेशात निरनिराळ्या विचारधारा असणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. त्यातूनच आपल्या विचारधारेच्या गटाला नावे देखील देण्यात आली असावीत. हीच नावे पुढे जाऊन
‘वंश’ म्हणून ओळखली गेली असावीत. जसे आजकाल लोक एकमेकाला हा कोंग्रेसी, हा भाजपवला, हा कम्युनिस्ट , हा द्रमुक वाला असे ओळखतात तसेच त्या प्रागैतिहासिक काळानुरुप , उदाहरणार्थ : हा आर्य , हा द्रविड, हा सूर्यवंशी ( सौर पंचांग वापरणारा), हा चंद्रवंशी (किंवा सोमवंशी – चांद्र पंचांग वापरणारा), असल्या प्रकारे ओळखत असावेत. याच ओळखींना कालौघाने “वंश ” ही संज्ञा प्राप्त झाली असावी. त्याचेच पुढील स्वरूप हे त्या त्या विचारधारेतील गटात जन्म घेऊन अलौकिक कर्म करून समाज मनावर आपले व्यक्तिमत्व कोरले जाईल अश्या प्रकारे जीवन व्यतीत केलेल्या महामानवांच्या नावाने, त्यांना आपला मूळ पुरुष मानून त्यांच्या पुढील पिढ्या ह्या त्या महान व्यक्तींच्या नावाने ‘ वंश ’ म्हणून गणल्या जाऊ लागल्या असे आढळते. उदाहरणार्थ ‘रघुवंश ‘ तथा ‘ कुरू वंश ‘. परंतु हे भाग्य बहुतांशी राजघराण्याशी संबंधित लोकांच्याच वाट्याला आलेले असू शकते.
सामन्यात: जनतेच्या दृष्टीने ज्या ज्या व्यक्तीने ज्या ज्या गुरुकुलातून आपले शिक्षण प्राप्त केले , त्या त्या गुरूंचे नाव आपल्या ‘वंश’ म्हणून चालविण्याची प्रथा पडली असावी. माझ्या ह्या चिंतनाने मला एकएक कोडे उलगडत असताना दिसते. ज्यामुळे बहुसंख्य हिंदू भारतीय व परदेशी लोकांच्या मनातील संभ्रम दूर होऊ शकेल. माझ्या चिंतंनांनुसार तत्कालीन मातृसत्ताक कुटुंब पद्धतीने प्रत्येक मानवीय समुदायाने जसे, आदितीचे पुत्र आदित्यगण, ताम्राचेपुत्र ताम्र उर्फ गंधर्व गण, विश्वाचे पुत्र यक्ष गण, ईराचे पुत्र वृक्षप्रेमी गण, (ज्यांच्या गण समूहाचे चिंन्ह एक एक वृक्ष होते.) विनितेचे वैनतेयगण, (ज्यांच्या गण समूहाचे चिंन्ह एक एक पक्षी होते.) सुरसेचे सारमेय गण, (ज्यांच्या गण समूहाचे चिंन्ह एक एक चतुष्पाद प्राणी होते.) अशी नावे दिलेली असावीत. असे चिंतन केल्यावर मला आढळले की, रामायणातील “ वानर ” या नावाने संबोधली गेलेले मनुष्य गण हे “ मानवच ” असून केवळ त्यांचा ध्वज हा “वानारांकित” असून त्यांना त्याचा अभिमान होता.
कारण आजही जर आपण दक्षिण भारतात बघितले, तर तेथील बर्याच जमाती ह्या वानरा प्रमाणे सरसर नारळाच्या झाडावर चढतात व त्या करता त्यांच्या कमरे भोवती एक दोर लपेटलेला असतो जो वानराच्या शेपटी समान असतो. ते लोक एका झाडावरून दुसर्या झाडावर ह्या दोराच्या सहाय्याने सहज उड्या घेऊ शकतात. पण आपल्या पूर्वापार मूर्ख कथेकरी, पुराणिकांनी , कथा , कादंबरी , सिनेमा , टीव्ही मालिका, वगैरे सोशल मीडियाने त्यांना चक्क वानर मुखी व शेपटीवाले दाखविले आहे . त्यामुळेच आपल्या स्वधर्मीय, तसेच पर धर्मीय लोकांपुढे अविश्वास निर्माण झाला आहे. म्हणुनच हनुमान , सुग्रीव , वाली , अंगद, आणि समस्त वानरसेना ही वानर मुखी व शेपटीवाले दाखविले आहे. पण मुळातच ही दाक्षिणात्य जमात माझ्या मते त्या काळी अत्यंत पुढारलेल्या तांत्रिक व वैज्ञानिक गोष्टींनी संपूर्ण असावी. त्यांना वैयक्तिक पॅराग्लाईडिंगची कला म्हणा किंवा तंत्रज्ञान अवगत असावे. म्हणूनच त्यांच्यातला सर्वोत्कृष्ट पॅराग्लाईडिंग करणारा तो श्री हनुमान असावा. ज्याने एका उड्डाणात भारत ते श्रीलंका अंतर पार केले असावे.
त्याचप्रमाणे उपरिनिर्दिष्ट विवेचनानुसार कद्रुचे पुत्र काद्र नागगण,यांस पूर्व गोलार्ध , [आजचा तिबेट, मंगोलिया, चीन, जपान दक्षिण आशिया खंड ]- अपऱ्या नाकाची ठेंगणी मंडळी. यांचे नंतरचे काव्य , ग्रंथ , वर्णनीय नाव म्हणजे ‘नाग गण ’ असावे. या नागगणाच्या विविध गटांनी आपआपल्या गटांचे ध्वज चिन्न्ह नाग या सरपटणार्या सर्पाच्या विविध प्रजातींचे ठेवून त्यांच्या गटांचे सम्राट त्यांच्या नावाने जसे १• नागराजा अनंत, 2. (शेष) नागराजा वासुकी,३• नागराजा तक्षक,४• नागराजा कर्कोटक,५• नागराजा ऐरावत असे ठेऊन विष, विषप्रयोग व विषप्रयोगावरील औषधी याचे ज्ञान यात श्रेष्ठता प्राप्त केलेली असून त्या प्रकारे आपले वर्चस्व संपूर्ण भारतखंडात प्राप्त केलेले असू शकते. जसे ह्या विषाने सम्पृक्त शरा च्या / बाणाच्या स्वरुपात एक नागास्त्र म्हणून वापरले.
नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापाशी नसून भारतात नाग हे “ध्वजचिन्ह”असणारे उपरिनिर्देशित पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत, त्यांच्याशी आहे. महाभारत युद्धानंतर संपूर्ण जंबुद्वीपत बहुतांशी क्षत्रिय राज्यवंशीय राजकुळे पुरुष योद्धे विरहित झालेली होती. त्यामुळे भारतवर्ष भूमीच्या सीमेवरील नाग वंशीय राजकुलांनी मुख्य भारत भूमीवर आपापला साम्राज्य प्रसार केला. माझ्या वाचनात आलेल्या इतिहासानुसार
ह्या पाचही नागवंशीय राजांची स्वतंत्र राज्ये होती. यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोवरा पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता. तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत असे ऐकले आहे. चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते. पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो. ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या. हे पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी “नागपंचमी” दिन दरवर्षी साजरा करीत असत.
कालांतराने अर्धवट अकलेच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणा-या सापात करुन टाकले. त्याचाच परिणाम म्हणून ‘नाग-नरसोबा’ आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून ओळखली जावू लागली आणि वास्तविक नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पराक्रमी पूर्वज पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटणारे सर्प नव्हेत.आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे. अभ्यासू मंडळींनी यावर अजून खोलवर अभ्यास करून वास्तविक सत्त्य पुढे आणणे आवश्यक वाटते.
डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, हिंगणा रोड नागपूर
===========



