साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव व विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात
रजत डेकाटे प्रतिनिधी

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव व विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात
सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेतर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
रजत डेकाटे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेतर्फे विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती तसेच विद्यार्थी सत्कार समारंभ विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी आयकर विभाग, भारत सरकारचे उपायुक्त अनिल खडसे, चंद्राइस फाउंडेशनच्या संचालिका सुचेता कांबळे, पिरॅमिड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. जयंत गणवीर, समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त (सेवानिवृत्त) आर. डी. आत्राम, विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ मर्या.चे अध्यक्ष प्रेमकुमार गजभारे, आकाश इन्स्टिट्यूटचे अमोल भामरे, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. निखिल डोंगरे यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रा. डॉ. जयंत गणवीर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शैक्षणिक व करिअरच्या संधींची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे दिली. अमोल भामरे यांनी JEE व NEET परीक्षांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधी, अभ्यासाचे नियोजन तसेच करिअरच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. निखिल डोंगरे यांनी प्रभावीपणे अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना कोणत्या बाबी टाळाव्यात आणि अभ्यासाची योग्य पद्धत कोणती असावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुचेता कांबळे यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांचा आढावा उपस्थितांसमोर मांडत संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
आर. डी. आत्राम यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देत भविष्यातही असेच उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
आयकर विभागाचे उपायुक्त अनिल खडसे यांनी छोट्या गावातून यूपीएससीपर्यंतचा आपला प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाचा अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रेमकुमार गजभारे यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय तायवाडे यांनी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक कार्य भविष्यातही अशाच जोमाने सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
ज्येष्ठांचा जीवनगौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतून महापुरुषांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन उपस्थितांसमोर घडविण्यात आले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या नाट्यछटेत सिद्धेश्वर नगर परिसरातील अनाथ मुलींच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. झोपडपट्टीतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत व्हीसीएच्या क्रिकेट संघात अंडर-१५ गटात निवड होईपर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास नाट्यछटेतून सादर करण्यात आला. या हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या मुलींच्या संघर्षाची दखल घेत कार्यक्रमस्थळीच संस्थेतर्फे त्यांना क्रिकेट युनिफॉर्म देण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. त्यामुळे या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुढे आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे आणि मनीषकुमार अडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मिलिंद घाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे यांच्यासह प्रकाश तायवाडे, राजेश वानखेडे, संतोष नुपनारायण, दीपक सरनाईक, उल्हास वानखेडे, सुभाष खंडाळ, राजेश गायकवाड, दीपिका अडागळे, संध्या अडागळे, वर्षा वानखेडे, शारदा वानखेडे, प्रिया बावणे, स्वाती वाघमारे, वैष्णवी साने, यथार्थ अडागळे, गौरी बावणे, सौम्या अडागळे, सानवी बावणे आणि इशिका बावणे यांनी विशेष प्रयत्न केले.



