आगरी समाज संस्थेची भर पावसात कनकेश्वर स्वच्छता मोहीम
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आगरी समाज संस्थेची भर पावसात कनकेश्वर स्वच्छता मोहीम
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : कनकेश्वर परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबागतर्फे रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सलग दुसऱ्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पावसाची संततधार सुरू असतानाही संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर व अन्य कचरा संकलित केला. या मोहिमेत सुमारे २० बॅग प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
मागील रविवारी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर संस्थेने ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी कार्यकर्ते कनकेश्वर येथे एकत्र आले. मंदिरात दर्शन घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पावसामुळे अडथळे निर्माण होत असतानाही कार्यकर्त्यांनी परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता केली.
कनकेश्वर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांचे रॅपर परिसरात न टाकता ते सोबत परत आणावेत, यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले. कचरा संकलनाबरोबरच नागरिकांच्या व पर्यटकांच्या सवयींमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला.
संकलित केलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या २० बॅगा पायथ्याशी आणण्यात आल्या. त्यानंतर टेम्पोची व्यवस्था करून हा कचरा भंगार व्यावसायिकाकडे देण्यात आला. संकलित प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात आले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
मोहिमेदरम्यान काही भाविकांनीही कचऱ्याच्या बॅगा पायथ्यापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांना सहकार्य केले. मात्र, परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ स्वच्छता मोहिमा राबविण्यापेक्षा कचरा न टाकण्याची सामूहिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी सांगितले.
या मोहिमेत आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील, सचिव श्री. प्रभाकर ठाकूर, सहसचिव श्री. उदय म्हात्रे, सहखजिनदार श्री. राजेंद्र पाटील, सल्लागार श्री. शशिकांत मिठाग्री, तसेच श्री. अंकुश पाटील, श्री. बिपीन टेमकर, श्री. वैभव पाटील, श्री. वैभव शेळके, श्री. रुपेश पाटील, कु. अर्णव पाटील, कु. सई पाटील, सौ. दिपश्री पाटील आणि सौ. दर्शना पाटील यांनी सहभाग घेतला.
“आपण निसर्गाकडून घेतो खूप काही; आता निसर्गासाठीही काहीतरी करूया,” या भूमिकेतून संस्थेने स्वच्छता उपक्रम सुरू ठेवला आहे. कनकेश्वर परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नागरिक, भाविक आणि पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
“स्वच्छ कनकेश्वर, सुंदर कनकेश्वर आणि प्लास्टिकमुक्त कनकेश्वर” हा संदेश देत या उपक्रमाला सातत्य देण्याचा निर्धार आगरी समाज संस्थेने व्यक्त केला आहे.



