अक्षरांच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक मेळावा! तीन साहित्यकृतींचे प्रकाशन
वसुधा नाईक प्रतिनिधी

अक्षरांच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक मेळावा! तीन साहित्यकृतींचे प्रकाशन
निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगली साहित्यिक मैफल
वसुधा नाईक प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: अक्षरवर्स पब्लिकेशन, बार्शी यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळा रविवारी’ पोतदार सभागृह’ सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला. साहित्यिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला कवी, लेखक, साहित्यप्रेमी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात कवयित्री अमृता कराड लिखित ‘एकतर्फी इश्कनामा’, रोहिणी दीपक आदलिंगे डाके संपादित ‘भक्ती’ आणि ऋतिक नानासो हंबीर संपादित ‘भावनांचा कल्लोळ’ या तीन साहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वसुधा वैभव नाईक होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला.
अक्षरातून उमलतात स्वप्न शब्दातून सजते बरसात मनीची साहित्यप्रेमींच्या मनामनात ज्योत अक्षरवर्सची. या बहारदार ओळींनी त्यांनी सर्वांची मने जिंकली. यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री चैताली कापसे मोडक यांनी ‘ उथळ लेखनातून मनोरंजन होते पण लेखन असे करावे की मनोबल वाढेल ‘हा सल्ला साहित्यिकांना दिला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक संजय पातुरकर यांनी भावनांचा कल्लोळ या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे.
सौ. संगीता लांबे यांनी आपल्या भाषणात ‘शब्दांचे धन सर्वात मोठे धन हे सांगितले’ आणि प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांनी सर्व पुस्तक प्रेमींचे स्वागत केले. त्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले लेखक व कवी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सर्वांनी शुभेच्छा दिल्या.सर्व साहित्यिकांचे कौतुक केले. ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली त्यांना शुभ आशिष दिले.
प्रकाशक तुषार पालखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून अक्षरवर्स पब्लिकेशनच्या साहित्यिक वाटचालीची तसेच या उपक्रमामागील भूमिका मांडली. नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्रीराम घडे, आरती ढोले पाटील, गौरव पुंडे, भालचंद्र खरळकर, वैशाली खाडे, संगम उबाळे, विनय पिंपरकर आणि दत्तात्रय वारडकर, सत्त्यभामा ताई, तुषार पालखे, योगेश हरणे, गजानन उफाडे व सुधीर कुलकर्णी
इत्यादी कवींनी आपल्या कविता उत्तम सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणीला उत्स्फूर्त दाद मिळाली. निमंत्रित कवींच्या दमदार आणि भावस्पर्शी कवितांनी संपूर्ण सोहळा रंगून गेला. पुस्तक प्रकाशनासोबतच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
प्रकाशन, सन्मान आणि काव्यवाचन अशा त्रिवेणी संगमामुळे हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगेश हरणे, रोहिणी आदलिंगे डाके, गौरव पुंडे आणि ऋतिक हंबीर, तुषार पालखे यांनी विशेष परिश्रम घेतले. गजानन उफाडे यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला आणखीन रंगत आली.



