‘सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब’; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

‘सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब’; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आणि समृद्ध परंपरांनी सजलेली आहे. या संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आपल्या सण-उत्सवांतून दिसून येते. वर्षभर येणारे विविध सणोत्सव म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नसून, ते भारतीय समाज जीवनाला एकत्र बांधणारे सांस्कृतिक दुवे आहेत. विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत आणि संस्कृती यांचा सुंदर संगम भारतीय समाजात पाहायला मिळतो. या विविधतेला एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य सणोत्सव करतात. म्हणूनच भारतीयांच्या जीवनात सणोत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नागपंचमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, ईद, ख्रिसमस अशा विविध सणांमधून भारताची धार्मिक व सांस्कृतिक विविधता अनुभवता येते. प्रत्येक सणामागे एखादी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक किंवा नैसर्गिक पार्श्वभूमी दडलेली आहे. सणांच्या निमित्ताने घरांची स्वच्छता, सजावट, रांगोळ्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, नवीन वस्त्रप्रावरणे आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठीमुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो.
भारतीय सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ऋतूचक्राशी असलेला जवळचा संबंध. भारतीय सणोत्सवांचा कृषी परंपरेशीही घनिष्ठ संबंध आहे. भारताची संस्कृती दीर्घकाळ कृषिप्रधान राहिल्यामुळे पेरणी, पिकांची वाढ, कापणी आणि नवीन धान्याचे आगमन यांचा आनंद सणांमधून व्यक्त होतो. महाराष्ट्रातील ‘पोळा’ हा शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा महत्त्वाचा सण आहे.
सणोत्सव हे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्ग आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहेत. सण म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा मनोरंजन नव्हे, तर समाजातील माणसांना एकत्र आणणारा, नात्यांमध्ये प्रेम व आपुलकी निर्माण करणारा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारा उत्सव होय. सणोत्सवांमुळे लोककला, लोकपरंपरा, खाद्य संस्कृती, वेशभूषा आणि सामाजिक ऐक्य यांचे संवर्धन होते. अशा प्रकारे ऋतू, निसर्ग, कृषी आणि मानवी जीवन यांना जोडणारा सांस्कृतिक सेतू म्हणजे सणोत्सव होय. परंपरेचा सन्मान राखत आधुनिक मूल्यांचा स्वीकार केल्यास सणोत्सवांचे सांस्कृतिक महत्त्व अधिक समृद्ध होईल.
आजच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘सणोत्सव’ हा अगदी योग्य विषय दिल्याबद्दल त्यांचे कौतुक. शिलेदारांनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मला काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल राहुलसरांचे मनापासून आभार !
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



