ग्रामीण भारताची यशस्वी पिढी घडवणारी ‘दगडी पाटी’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

ग्रामीण भारताची यशस्वी पिढी घडवणारी ‘दगडी पाटी’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
शाळा सुटली, पाटी फुटली
आई मला भज्यानं मारलं
त्याच्या काय कुणाचं खाल्लं…
शाळा सुटली की मोठ्याने हेच गाणे म्हणत पळणारे बाल चिमुकले आठवले आणि त्या नशिबवान चिमुकल्यांमध्ये मी ही होते, हे माझे सौभाग्यच….! पूर्वीची शाळा म्हणजे काय तर हातामध्ये कापडी किंवा पोत्यापासून शिवलेली पिशवी आणि त्यामध्ये असणारी दगडी पाटी आणि त्या पाटीवर लिहिण्यासाठी पेन्सिलीचे तुकडे. आता ही पेन्सिल म्हणजे कधीकधी लिहिण्याबरोबरच खाण्यासाठी ही वापरली जात असे. तिला खाण्याचा मोह आवरत नव्हता इतकी ती छान लागत असे. त्या काळचा असा एकही बालक नसेल त्याने पेन्सिलची चव घेतलेली नाही. अजूनही तिची चव जिभेवर रेंगाळते.
आता ही दगडी पाटी खापरापासून बनवलेली असे. काळ्याभोर पाटीला फिक्कट पिवळा किंवा पांढरसरच म्हणा ना अशी लाकडी चौकट असे. कधी कधी ही चौकट निघून जाई आणि मागे उरायचे फक्त खापर. त्याकाळी स्कूल बॅग वगैरे असे काही नव्हते, तर पाटी आणि दप्तर म्हणून दप्तर ओळखले जायचे. आणि अभ्यास तरी कितीसा ? दिवसभर त्याच पाठीवर लिहायचे, परत पुसायचे, परत लिहायचे आणि दोन्ही बाजूंनी जेवढा बसेल तेवढाच गृहपाठ करून आणायचा. आणलेला गृहपाठ गुरुजी पाहत नाहीत तोपर्यंत अगदी जपून ठेवायचा. कारण सहज हात फिरला तरी गृहपाठ मोडला जात असे. पळता पळता एखाद्या वेळेस जर पडले तर ही पाटी फुटायची आणि तिचे तुकडे व्हायचे. त्या तुकड्यांचाही वापर शिकण्यासाठीच व्हायचा.सहजासहजी डबल पाटी मिळायचीच नाही. या खापराच्या पाटीने, तुकड्यांनी किती जणांचे तरी भविष्य जोडले. अशी ही बहुगुणी दगडी पाटी.
आणि याच दगडी पाटीने कोऱ्या पाटीचे रूपांतर एका भक्कम पिढीमध्ये केले. आजचे भक्कम ओझे असणारे दप्तर पाहता आठवते ती लहानपणची दगडी पाटी. सहजपणे अक्षरे मोडणाऱ्या, पुसणाऱ्या आणि हातातून सुटताच फुटणाऱ्या कोऱ्या पाटीवर किती जणांचे उज्वल भविष्य लिहिले गेले हे सांगताही येणार नाही. त्या काळच्या पाटी पेन्सिलचा विचार केला, तर सध्या आवश्यक असलेले हे बोजड दप्तर आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वाकवून टाकणारे ओझे खरंच आवश्यक आहे का ? त्यामुळेच खरंच ही पिढी घडत आहे का? पाठीवरील ओझ्या बरोबरच वाढणारे अपेक्षांची ओझेही काही कमी नाही. खरंच इतक्या अपेक्षा आपण अनाठायी तर ठेवत नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
आज ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धे’मध्ये राहुल दादांनी ‘दगडी पाटी’ हा विषय दिला आणि आमचे शिलेदार बंधू-भगिनी या दगडी पाटीमध्ये इतके गुंतले की, त्यांनी भूतकाळ जणू पेन्सिलीने पाठीवर लिहून सर्वांसमोर मांडला. आजच्या पिढीसमोर जर ही दगडी पाटी चित्रित केली तर खरच त्यांना तिची कल्पना तरी करता येईल का? पण चला प्रयत्न तर करून पाहूया, त्यांना या मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून आपल्या दगडी पाठीच्या विश्वात नेण्याचा….!! मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण..धन्यवाद…!!!
पुन्हा नव्याने मी जगावे
हसत खेळत बालपण यावे
स्वैर पुन्हा बागडताना
हळूवार पाटीने हाती यावे
मी लिहावे, मी लिहावे
कधीही न पुसणारे मी लिहावे..
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



